Read More : mahatma gandhi information in marathi
जन्म : ऑक्टोबर २, इ.स. १८६९
पोरबंदर, काठियावाड, ब्रिटिश भारत
मृत्यू : जानेवारी ३०, इ.स. १९४८
नवी दिल्ली, भारत
चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना : अखिल भारतीय कॉंग्रेस
प्रमुख स्मारके : राजघाट
धर्म : हिंदू
पत्नी : कस्तुरबा गांधी
भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असे महात्मा गांधींना म्हणता येईल. म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता असा दर्जा देण्यात आला आहे. आपल्या या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. गांधी हे वैष्णव वाणी. गांधींचे आजोबा उत्तमचंद यांना पोरबंदर संस्थानची दिवाणगिरी मिळाली होती. गांधींचे वडील करमचंद हे प्रथम पोरबंदर संस्थानचे व नंतर राजकोट संस्थानचे दिवाण होते. आई पुतळीबाई व वडील हे दोघेही शीलसंपन्न व धर्मनिष्ठ होते.
ते नियमाने धार्मिक ग्रंथांचे पठन करीत व आपल्या मुलाबाळांना धार्मिक कथा सांगून सदाचरणाचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवीत. त्या वेळी धार्मिक नाट्यप्रयोग फार होत असत; ते पाहण्यात आणि ध्रुव, प्रल्हाद, हरिश्चंद्र यांच्या कथा ऐकण्यात मोहनदास बाळपणी सातआठ वर्षांचे असताना रंगून जात. हरिश्चंद्राच्या अद्भुतरम्य कथेचे त्यांना वेडच लागले होते. हरिश्चंद्र नाटक त्यांनी वारंवार पाहिले. अहिंसात्मक सत्याग्रहाला आवश्यक निष्ठेची मनोभूमिका लहानपणीच तयार झाली.

कस्तुरबा आणि मोहनदास यांचे वय सारखेच होते. या दोघांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी झाला. ही विद्यार्थी दशा होती. घरचे वातावरण शीलसंपन्नाचे असले, तरी बाहेरचे सवंगडी आणि मित्र निरनिराळ्या कौटुंबिक परिस्थितीत होते. त्यांनी मांसाहार, धुम्रपान, वेश्यागमन इ. गोष्टींचे प्रलोभन मोहनदासांना दाखविण्याचा प्रयत्न केला. ते त्यात काही काळ फसलेही. परंतु तीव्र पश्चात्ताप होऊन ते त्यातून लवकरच बाहेर पडले. १८८७ साली ते मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले.
गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला, स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यांनी खेड्यांना खऱ्या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. ब्रिटनमधील विन्स्टन चर्चिल यांनी १९३० साली त्यांची “अर्धनग्न फकीर” म्हणून निर्भत्सना केली. स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती. त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले. त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये भारत पाकिस्तान फाळणीमुळे व्यथित झालेल्या गांधींनी हिंदू-मुस्लीम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्न केले.
अनुक्रमाणिक
महात्मा गांधींचे कार्य :
असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला.
१९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकर्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले.
१९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली.
गांधीजी आजीवन साम्प्रदायीकातावादा (सम्प्रदायांवर राजकारण करणे) चे विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले.
ढासळत जाणार्या खिलाफत चळवळीला त्यानी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले.१९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. (२५० मैल) लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले.
१९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले.
या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले.

स्वातंत्र्यसंग्राम :
इ.स. १९१५मध्ये गांधीजी कायमसाठी भारतात परत आले. एक प्रमुख भारतीय राष्ट्रवादी, थिओरिस्ट आणि संघटक अशी त्यांची आंतरराष्ट्रीय ख्याती होती. ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अनेक संमेलनांतून बोलले. खऱ्या अर्थी भारताचे राजकारण व समस्या यांचा परिचय त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी करून दिला. गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रमुख नेते होते. गोखले त्यांच्या संयम, संतुलन आणि व्यवस्थेच्या आतमध्ये राहून काम करण्याच्या आग्रहाबद्दल ओळखले जात. आजही ते गांधीजींचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जातात. गांधीनी गोखल्यांचा ब्रिटिशांच्या परंपरांवर आधारित उदार दृष्टिकोन अनुसरला, आणि तो पूर्णपणे भारतीय दिसण्यासाठी बदलला. १९२० मध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाल्यावर ते राष्ट्रीय सभेचे प्रमुख नेते बनले.
गांधीनी १९२०मध्ये कॉंग्रेसच्या नेतृत्वाची सूत्रे हातात घेतली. त्यानंतर मागण्यांमध्ये सतत वाढ करत करत (काही ठिकाणी थांबत आणि तडजोड करत) २६ जानेवारी १९३० कॉंग्रेसने भारताचे स्वातंत्र्य जाहीर करून टाकले. अधिकाधिक वाटाघाटी होत गेल्या आणि कॉंग्रेसने १९३०मध्ये प्रांतीय सरकारमध्ये भाग घेऊ पर्यंत ब्रिटिशांना हे ओळखता आले नाही. १९३९च्या सप्टेंबर मध्ये कोणाशीही सल्लामसलत न करता व्हाईसरॉयने जेव्हा जर्मनीविरुद्ध युद्ध जाहीर केले तेंव्हा गांधीनी आणि कॉंग्रेसने ब्रिटिश सरकारचा पाठिंबा काढून घेतला. गांधीनी १९४२मध्ये तत्काळ स्वराज्याची मागणी करेपर्यंत आणि ब्रिटिश सरकारने प्रतिसाद म्हणून त्यांना आणि लाखो कॉंग्रेसच्या नेत्यांना तुरुंगात डांबेपर्यंत तणाव वाढतच गेला. दरम्यान मुस्लीम लीगने ब्रिटन ला सहकार्य केले, आणि गांधींच्या तीव्र विरोधाला डावलून मुस्लिमांच्या संपूर्ण स्वतंत्र राष्ट्राची, पाकिस्तानची मागणी केली. १९४७ मध्ये ब्रिटिशानी भूमीची फाळणी केली आणि गांधीनी अमान्य केलेल्या शर्तींवर भारत आणि पाकिस्तानने वेगवेगळे स्वातंत्र्य मिळवले.
भारतातील सार्वजनिक जीवन :
गांधी दक्षिण आफ्रिकेला कायमचा रामराम ठोकून इंग्लंडमार्गे ९ जानेवारी १९१५ रोजी मुंबईस परत आले. नामदार गोखले यांनी, भारतात गेल्यावर एक वर्षपर्यंत सार्वजनिक चळवळीत न पडता केवळ तटस्थपणे परिस्थिती समजावून घ्या, असे त्यांना बजावून सांगितले होते. मुंबई, मद्रास इ. शहरांमध्ये त्यांच्या सत्काराच्या सभा झाल्या. गांधींनी हरद्वारचे गुरुकुल व शांतिनिकेतन यांस भेटी दिल्या. हरद्वार येथे कांगडी गुरुकुलाचे आचार्य श्रद्धानंद यांची गाठ पडली. त्यांनीच प्रथम गांधींचा महात्मा म्हणून निर्देश करून गौरव केला. अहमदाबाद येथे साबरमती तीरावर २५ मे १९१५ रोजी सत्याग्रहाश्रम स्थापन केला. आश्रमात राहणाऱ्या एका अस्पृश्यामुळे अहमदाबाद येथील व्यापा ऱ्यांनी आश्रमास देणग्या देण्याचे बंद केले. आश्रम बंद पडण्याची वेळ आली. परंतु गांधींनी अस्पृश्यांना आश्रमात ठेवण्याचा आग्रह चालू ठेवला. हळूहळू पुन्हा अनुदान मिळू लागले व आश्रम स्थिरावला. विनोबा भावे, काकासाहेब कालेलकर, संगीतज्ञ खरे गुरूजी, गोपाळराव काळे, महादेवभाई देसाई, जे. बी. कृपलानी, किशोरलाल मश्नुवाला, प्यारेलाल इ. गांधींचे अनुयायी आश्रमी बनले. हा सत्याग्रहाश्रम तेव्हापासून हळूहळू भारताच्या राजकीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे मुख्य केंद्र बनला.
हिंदू विश्वविद्यालयाचा स्थापना समारंभ ४ फेब्रुवारी १९१६ रोजी झाला त्या सभेत व्हाइसरॉय लॉर्ड हर्डिंग, ॲनी बेझंट, हिंदी महाराजे, त्यांच्या राण्या, उच्चपदस्थ अधिकारी व अनेक पुढारी उपस्थित होते. या सभेत गांधींनी भाषण केले. ते म्हणाले, ‘कालच्या चर्चेमध्ये भारताच्या गरिबीबद्दल मुक्त कंठाने भाषणे झाली. पॅरिसच्या जवाहि ऱ्यालाही दिपवून टाकणाऱ्या जडजवाहिरांनी मंडित राजेमंडळी येथे बसलेली आहेत. भारताची गरिबी नष्ट करावयाची तर अगोदर, डोळे दिपविणारे जडजवाहिर राजेमहाराजांपाशी आहेत, तेच काढून घेऊन याचा भारताच्या जनतेकरिता निधी निर्माण करावा. हे सर्व धन गरीब शेतकऱ्यांच्या श्रमातून निर्माण झाले आहे. शेतकऱ्याची मुक्ती शेतकरीच करू शकेल. वकील, डॉक्टर, जमीनदार हे करू शकणार नाहीत’. अशा अर्थाचे भाषण चालू असताना ॲनी बेझंट यांनी गांधींना हटकले व भाषण बंद करण्यास सांगितले. गांधी थांबले नाहीत. बेझंटनी ती सभा रागावून बरखास्त केली.
गांधींनी १९१७ मध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बिहारमधील चंपारण्यास भेट दिली. त्या परिसरात गोऱ्या लोकांचे उसाचे व निळीचे मळे होते व तेथील हिंदी शेतकरी त्यांची कुळे होती. हे मळेवाले शेतकऱ्यांना छळीत, लुबाडीत, मारीत व त्यांची आर्थिक पिळवणूक करीत. ब्रिटिश सरकारने गांधींना चंपारण्य सोडून जाण्याचा हुकूम दिला. तो गांधींनी मानला नाही. या वेळी राजेंद्रप्रसाद, ब्रिजकिशोर, मझरूल हक इत्यादींचा परिचय झाला. चंपारण्य जिल्ह्यातील ८५० खेड्यांतील सु. ८,००० शेतकऱ्यांच्या तक्रारी गांधींनी लिहून घेतल्या. १३ जून १९१७ रोजी सरकारला चौकशी समिती नेमावी लागली. समितीच्या शिफारशीप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांकडून खंड कमी घेतला जाईल, वेठबिगार रद्द होईल व इतर जुलमी प्रकार होणार नाहीत, असे १८ ऑक्टोबर रोजी जाहीर केले.
चंपारण्य सत्याग्रहामुळे गांधींजींचे भारतीय नेतृत्त्व चमकू लागले. त्यानंतर अहमदाबादच्या मजुरांच्या तुटपुंज्या पगाराचा प्रश्न उत्पन्न झाला. युद्धजन्य महागाई शिगेस पोहोचली होती. मजुरांचा सत्तर टक्के बोनस गिरणीवाल्यांनी रद्द करण्याचे जाहीर केले. सु. ८०,००० मजुरांनी सत्याग्रह करण्याचा बेत केला. बावीस दिवस संप चालला. गांधींनी मजुरांचा संप टिकविण्यासाठी उपोषण केले. तीन दिवसांत यश आले. मालकांनी ३५% पगारवाढ मान्य केली. असे तंटे पुन्हा होऊ नयेत म्हणून मजुर-महाजन नावाची संस्था स्थापन झाली. मजुरांप्रमाणे शेतकऱ्यांचाही प्रश्न याच साली उत्पन्न झाला. खेडा जिल्ह्यात भयंकर दुष्काळ पडला तरी सरकार, चार आणेच पीक येऊन देखील, शेतसारा वसूल करू लागले. गांधींनी करबंदीची चळवळ हाती घेतली. ही चळवळ पसरू लागली, म्हणून सरकार नमले व शेतसारा माफ झाला.

महात्मा गांधी यांचे मराठी सुविचार :
जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.
कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.
माझ्या परवानगीशिवाय. मला कुणीही दुखावू शकत नाही.
इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल.
देवाला कोणताच धर्म नसतो.
आम्ही आमचा स्वाभीमान कुणला दिलाच नाही, तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही.
रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण ह्रदय हवे. ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत.
एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत, हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते.
तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता. पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत.
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी आहे, हेही मला मान्य आहे. म्हणूनच फार पूर्वी मी एक निष्कर्ष काढलाय, की सर्वच धर्म सत्य आहेत आणि सर्वांमध्ये काही ना काही चुका आहेत.
तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही. पण तुम्ही काहीच केले नाहीत, तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही.
प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून फार छान शिकता येते.
धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे.
कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.
चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही. देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही आपण चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे.
बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा करू शकत नाही. बलवान माणूसच क्षमा करू शकतो.
अहिंसा हे बलवानांचे शस्त्र आहे.
Read More : बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत लढाई कशी लढली जाणून घेण्यासाठी यावर क्लिक करा..👈
Read More : कादर खान यांची motivational story वाचण्यासाठी यावर क्लिक करा..👈
Read More : मराठी सुविचार वाचण्यासाठी यावर क्लिक करा.. 👈