stories in marathi with moral | मराठी गोष्टी

“एकदा, एका पाथरवटाने देवाच्या सुंदर मूर्ती बनवल्या. देवाच्या मूर्ती विकण्यासाठी बाजारात न्याव्यात म्हणून त्याने आपल्या गाढवावर त्या मूर्ती लादल्या व तो बाजाराच्या दिशेने निघाला.
दगडात कोरलेल्या त्या देवांच्या मूर्ती पाहून येणारे सहजच हात जोडून मूर्तीना नमस्कार करीत. पण नमस्कार त्या देवाच्या मूर्तीना आहे हे त्या मूर्ख गाढवाला कळले नाही. त्याला वाटे जो तो आपल्यालाच नमस्कार करतोय. त्यामुळे स्वत:ला कोणी तरी मोठा
समजून गाढव एक पाऊलही पुढे टाकीना.
बराच वेळ पाथरवटाच्या लक्षात येईना. गाढव अडलंय का? आणि जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा हातातल्या काठीचा जोरदार फटका गाढवाला हाणत पाथरवटा म्हणाला, “”प्रत्येक माणूस तुला नमस्कार करतोय आणि तू कोणी महान आहेस असं तुला वाटतंय. पण मूर्खा, लोक नमस्कार त्या मूर्तीना करताहेत. आता चल नाही तर आणखी मार खाशील.’
तात्पर्य : खोट्या अहंकाराने फजितीची वेळ येते.”

एका जंगलात भासुरक नावाचा सिंह खूप शक्तिमान असल्याने गर्वाने फुगला होता. रोज भासुरक त्याच्या मनाला वाटेल तितकी जनावरे मारून खायचा. भासुरकाच्या अशा आततायी कृत्यामुळे जंगलात एकही प्राणी शिल्लक रहाणार नाही अशी भीती जंगलातल्या सर्व जनावरांना वाटू लागली. म्हणून जंगलातले सर्व प्राणी भासुरकाकडे गेले.
सर्व प्राण्यांनी भासुरकाला विनंती केली, ”महाराज आपली गरज फक्त एकाच प्राण्यापुरती असताना आपण दररोज आम्हां गरीब प्राण्यांचा का प्राण घेता? आजपासून तुम्ही इथेच बसा. आम्ही जंगलातल्या एकेका जनावराची पाळी भोजनासाठी लावतो. त्यामुळे आपली भूकही शमेल आणि विनाकारण होणारा संहारही थांबेल.”
भासुरक सिंहाला प्राण्यांचे बोलणे पटले. पण त्याबरोबरच त्याने सर्व प्राण्यांना इशारा दिला की, ”मला बसल्या जागी एक प्राणी खायला मिळाला तरमला दुसरं काही नको पण लक्षात ठेवा, एक दिवस जरी यात खंड पडला तरी सर्वांना ठार करीन.”
सर्व प्राण्यांनी भासुरकाचा इशारा लक्षात ठेवून एकेक प्राणी भासुरकाकडे पाठवण्यास सुरुवात केली. प्रथम प्रथम म्हातारे ,जगण्याला कंटाळलेले, दु:खी-कष्टी प्राणी पाठवले पण नंतर चांगले धष्टपुष्ट प्राणी बळी म्हणून जाऊ लागले. तेव्हा विचार करण्याची पाळी जंगलातल्या प्राण्यांवर आली.
त्याचवेळी एकदा एका सशावर पाळी आली. ससा भासुरकाकडे जात असताना विचार करत होता की, ”आपल्यातला एक प्राणी बळी जातो आहे त्यापेक्षा सिंहालाच ठार मारले तर… पण कसं शक्य आहे?”
तेवढ्यात त्याला रस्त्यात एक विहिरीत सहज वाकून बघतो. तेव्हा त्याचे प्रतिबिंब विहिरीत दिसते. ते बघून त्याच्या डोक्यात कल्पना येते की सिंहाला ठार मारायला ही युक्ती वापरू. संध्याकाळी उशिरापर्यंत वेळ काढून मग सिंहाकडे ससा गेला.
रोजची भुकेची वेळ होऊन गेल्याने सिंह चांगलाच भुकेलेला होता. ससा आलेला बघताच भासुरक सिंह खवळतो, ”अरे ससुर्ड्या होतास कुठे तू? एक तर माझ्या घासालाही तू पुरणार नाहीस त्यात उशिराने आलास… थांब आधी तुला खातोच मग जंगलातल्या सर्व प्राण्यांना खातो.”
ससा घाबरतो पण धीर करून बोलतो, ”महाराज, मला वेळ झाला त्याला मीच नव्हे तर जंगलातले इतर प्राणीही जबाबदार नाहीत.” तुला वेळ होण्याचं कारण काय? सिंह आणखीनच चवताळतो.
”महाराज, ठरल्याप्रमाणेच मी येत होतो. पण रस्त्यात एका गुहेतून एक सिंह माझ्यासमोर आला. मला धमकावीत विचारलं, ”कुठं चाललास? तेव्हा मी सांगितलं की आमचे भासुरक सिंह महाराजाकहे चाललोय!” तेव्हा मला म्हणाला, ”कोण कुठला भासुरक म्हणे महाराज.
एक नंबरचा चोर, त्याला आण बोलावून नाहीतर जंगलातल्या सर्व प्राण्यांना मी ठार करीन. शेवटी मीच राजा आहे ह्या जंगलाचा!” सशाचे बोलणे ऐकताच भासुरक चवताळला, ”तो दरोडेखोर सिंह राहतो कुठ दाखव मला…आजच्या आज त्याला ठार मारून टाकतो.”
ससा उत्तरतो, ”पण महाराज त्याची गुहा अत्यंत अडचणीच्या जागी असून आपणास त्रास व्हायचा.” सिंह रागाने लाला होऊन उद्गारतो, ”तुला काय करायचंय… आताच्या आता त्याचा फडशा पाडतो बघ.” ससा सिंहाला घेऊन त्या विहिरीजवळ जातो. आत वाकून बघत सिंहाला सांगतो, ”तुम्हाला आल्याचं बघून लपलेला दिसतोय.”
तेव्हा भासुरक सिंह स्वत: विहिरीच्या तोंडातून वाकून बघतो. तेव्हा स्वत:चे प्रतिबिंब बघून भासुरक मोठी गर्जना करतो. त्या गर्जनेचा प्रतिध्वनी विहिरीतून आल्याने भासुरक चिडून विहिरीत उडी मारतो आणि पाण्यात बुडून मरतो. ताबडतोब ससा आपल्या सर्व प्राणिमित्रांना ही गोष्ट कळवतो आणि सर्व प्राणी खूष होतात.
तात्पर्य: शक्तिपेक्षा युक्तीच श्रेष्ठ ठरते.

“एका उंदिराचे पिटुकले पिल्लू पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, “आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच.
रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश्श शब्द केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या.
दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही.
हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, “वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव.” तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड
व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.
तात्पर्य : बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.”